Thursday, September 5, 2024

घेऊन जा गे मारबत ...

घेऊन जा गे मारबत ...
_______________________________
प्रसाद द. पोफळी, नागपूर

मला आठवतं… मी लहान होतो, पाच सहा वर्षाचाच असेन. आमचं राहणं नागपुरातल्या मूळ जुन्या वस्तीत, महालात. त्यावेळी माझे वडील स्व. राजाभाऊ पोफळी नागपूरच्या तरुण भारत या वर्तमानपत्रात वार्तांकनाचे (रिपोर्टिंगचे) काम करीत असत. त्यामुळे कुठलाही सणवार असला तरी बाबांना सुट्टी नसायचीच… बाबांनी कधी गणपतीच्या दिवसात सार्वजनिक गणपती दाखवायला नेलं असावं हे स्मरणात नाही. मात्र बऱ्याचदा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद प्रतिपदेला नागपुरात निघणाऱ्या मारबत मिरवणुकीच्या वार्तांकनाच्या निमित्तानं घराजवळच्या बडकस चौकात आले असताना मुद्दाम तेव्हढ्याही घाईत घरी येऊन मला घेऊन मारबत दाखवायला नेल्याचे मात्र पक्के स्मरणात आहे. त्यांच्या वृत्तपत्रातील कामांमुळे त्यांच्या सोबत काम करणारे सहकारी छायाचित्रकारही माझ्या ओळखीचे झाले होते. अनेक दुकानदारांशी त्यांचा संपर्क आणि ओळख होती. कधी एखाद्या ओळखीच्या दुकानात काउंटरवर उभे राहून तर कधी बाबांच्या सहकारी छायाचित्रकारांच्या खांद्यावर बसून ही मारबत मी बघितलेली आहे. 

नंतर जसजसा मोठा होत गेलो स्वतःच मित्रांसोबत फिरायला लागलो तेव्हा तरुणाईतला सणांचा उत्साह अनुभवायला मित्रांसोबत जायचो. मात्र हे सर्व अनुभवतांना काही प्रश्न सतत मनात डोकवायचे …  ही मारबत आणि बडग्या, हा उत्सव सुरू कुणी केला ? या मागील नेमका उद्देश काय असावा ? आणि मग याबाबतचे कुतूहल शमविण्यासाठी पुन्हा एकदा बाबांकडे परतलो. 

त्यांनी जे काही सांगितलं त्यातून मला उमगलं की मारबतीचा उगम श्रावण महिनाभर चालणाऱ्या भागवत कथेत आहे. त्यात मायेचे स्वरूप असलेल्या मावशीचे मायावी रूप घेऊन कृष्णाला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुतना या राक्षशिणीची गोष्ट येते. त्या आपल्यातलीच एक होऊन आपल्यातले देवत्व नष्ट करू पाहणाऱ्या वृत्तीचे प्रतीक असलेल्या पुतना मावशीचे प्रतिकात्मक दहन या भावनेतून सुरुवातीला श्रावण महिना आणि भागवत संपताना ही प्रथा अतिशय सीमित स्वरूपात सुरू झाली. जुन्या काळात म्हणजे भोसल्यांचे राज्य येण्यापूर्वीच्या नागपुरातील मूळ वस्ती असलेल्या जागनाथ बुधवारी, पाचपावली या भागात राहणाऱ्या विशेषतः तेली व काही कोष्टी समाजातील लोकांनी ही सुरुवात केली. पावसाळ्यात त्या समाजातील लोकांना काम करण्यास उपयुक्त काळ नसल्याने जरा फुरसतीचा काळ असे. त्यामुळे भागवत ऐकणे श्रावण महिनाभर खानपानाचे व्रत पाळणे होत असे. आणि श्रावण अमावस्येला मोठ्या पोळ्याला श्रावण संपल्यावर भाद्रपद प्रतिपदेला या व्रताची समाप्ती करताना त्या भागवतात आलेल्या पुतना मावशीचे दहन करून आनंदोत्सव साजरा करण्याचा हा प्रघात पडला. म्हणूनच आजही काळ्या मारबतीचे रूप हे पुतना मावशीचेच असते. तसेही पावसाळी ओलसर वातावरणात तयार होणारे कीटक, माश्या आणि त्यामुळे पसरणारी रोगरोगाई याचा नाश व्हावा म्हणून त्याकाळी पळसाची पाने जाळून धूर करण्याची पद्धत होतीच. एकूणच काय वाईट गोष्टींचा नाश करण्याचा आणि आनंदोत्सव साजरा करण्याचा हा दिवस होता. दे मार .. दे बत्ती .. असे ओरडत त्या पुतना मावशीच्या पुतळ्याची मिरवणूक काढून नंतर दहन होत असे म्हणून ती "मारबत" झाली.

नंतरच्या त्या काळात नागपुरात भोसल्यांची राजवट सुरू झाली. भोसल्यांच्या राजवटीत नागपूर आणि परिसरात होणारे कापसाचे उत्पादन आणि त्यामुळे भोसल्यांनी सोलापूर, छत्तीसगड, बंगाल भागातून नागपुरात आणून राजाश्रय दिलेले विणकर समाज मोठ्या प्रमाणात होता. नागपूर हे कापड उत्पादनाचे एक मोठे केंद्र होते. त्याकाळात ब्रिटिशांच्या आक्रमणाला नागपूरकर भोसल्यांनी आपल्या युद्ध कौशल्याने आणि पराक्रमाने जेरीस आणले होते. अशावेळी त्याच भोसले घराण्यातील बाकाबाईने आपल्या महत्त्वाकांक्षी सत्तालोलुपते मुळे आपल्याच राज घराण्याच्या विरोधात जाऊन ब्रिटिशांशी हातमिळवणी केली. तिला भोसल्यांच्या चिटणीसानी मदत केली. आणि भोसल्यांचा पाडाव झाला. ह्या घटनेच्या नागपूरातील विणकर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि बाकाबाई चा आणि ब्रिटिशांचा निषेध म्हणून या धार्मिक प्रथेला सामाजिक आयाम मिळाला आणि मोठ्या प्रमाणात मारबतीची मिरवणूक निघायला लागली. आता लोकांना त्या पुतना मावशीचे रूप असलेल्या काळ्या मारबती मध्ये आपल्यातल्याच राक्षसी प्रवृत्तीची बाकबाई दिसू लागली. आणि ब्रिटिशां विरोधात जनमत घडविण्या करीता काळ्या मारबती सोबतच अन्यायकारक ब्रिटिशांच्या व्हिक्टोरिया राणीचे प्रतीक  म्हणून पिवळ्या मारबतीची तसेच भोसल्यांच्या फितूर चिटणीसाचे प्रतीक म्हणून बडग्याची सुद्धा मिरवणूक निघू लागली. मात्र ब्रिटिशांनी अशा प्रकारे त्यांच्या प्रशासना विरोधात कुठलाही प्रयत्न हा गुन्हा समजून दडपशाहीचे धोरण अवलंबले होते. तरीही जनतेत अधिक असंतोष पसरू नये याची ब्रिटिशांना चिंता होतीच. म्हणुनच धार्मिक कार्यक्रमांवर त्यांचा आक्षेप नसे. याचाच फायदा घेऊन लोकांमध्ये जागृती व्हावी पण  हे त्या ब्रिटिशांना कळू नये म्हणून या पिवळ्या मारबतीला देवीचे धार्मिक स्वरूप देण्यात आले. आणि पिवळ्या मारबतीचे देवस्थान सुद्धा तयार केले गेले. पुढे कालांतराने या देवी बद्दल लोकांमध्ये श्रद्धा वाढत गेली आणि जनमानसात देवी प्रस्थापित झाली.

आता स्वातंत्र्योत्तर काळात समाज सुधारणांवर भर दिला गेला. आणि त्या बाकाबाई, ब्रिटिश आणि चिटणवीसांच्या निषेधाची जागा समाजातील इतर कुप्रथांनी घेतली. म्हणूनच विविध सामाजिक संस्था त्या त्या वेळी  समाजात असणाऱ्या कुप्रथा आणि देशद्रोही समाजविघातक प्रवृत्ती आणि प्रशासनातील निंदनीय व्यक्ती यांचा निषेध म्हणून निरनिराळे प्रतिकात्मक पुतळे तयार करू लागल्या. त्यांची मिरवणूक या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काळ्या पिवळ्या मारबतीं आणि बडग्या सोबत निघू लागली. जी आजतागायत सुरू आहे.

या नागपुरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मिरवणुकीला कित्येक पिढ्यांची परंपरा आहे, संदर्भ आहे. बराच काळ लोटला. लहान असतांना मी बालसुलभ आकर्षणाने या मिरवणुकीला बघत आलो. नंतर मोठा झाल्यावर वडिलांनी दिलेल्या माहितीमुळे या उत्सवा कडे बघण्याची माझी दृष्टी बदलली. आज हे ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्या इतका माझा मुलगा समजदार झाला आहे. आता नागपूर शहर विस्तारित झाले आहे. आजूबाजूच्या गावांमधील, विदर्भातील गावांमधून आणि इतरही देशभरातील अनेक शहरांमधून बरेच नागरिक नागपुरात वास्तव्याला आले आहेत. त्यांना नागपूरचा हा ऐतिहासिक उत्सव कळावा, हा उत्सव अधिक प्रतिष्ठित व्हावा हीच सदिच्छा !!

बाकी .... डास-किटकुले, माशा-मुरकुटे, ईडा-पीडा घेऊन जा गे मारबत ...!!

प्रसाद द. पोफळी, नागपूर
M: 9822569648