Monday, March 2, 2026

कैसी होरी मचाई, कन्हाई …

 कैसी होरी मचाई, कन्हाई …
• प्रसाद द. पोफळी, नागपूर
___________________________________

होळी म्हणजे रंगांचा उत्सव ...  एकमेकांवर रंगांची उधळण करण्याचा दिवस ... अशा या होळी उत्सवाचे वर्णन अनेक भारतीय भाषांमधील साहित्य, संगीत आणि पारंपारिक गाण्यांमधुन वेळोवेळी केल्या गेलं आहे. यानिमित्ताने, यामाध्यमातून आपल्या मूळ अध्यात्मिक संस्कृतीचे प्रभावी चिंतन सुद्धा वेळोवेळी प्रकट होत असतं. आपल्या अवतारकार्यातून अध्यात्म सांगणारे, संपूर्ण समाजमनावर सहस्रावधी वर्षां पासून अधिराज्य करीत असलेले भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विविध कृष्णलीलांच्या माध्यमातून, त्यांच्या द्वारे गोपगोपिकां सोबत खेळल्या गेलेल्या होळीच्या रुपकातून  विश्वाच्या निर्मितीचे सार मांडण्याचा प्रयत्न केला जातो.

कैसी होरी मचाई, कन्हाई
अचरज लख्यो ना जाई, कैसी होरी मचाई…

स्वामी ब्रह्मानंद यांनी केलेली ही रचना अशीच आहे. यात मानवी जन्माची आणि सृष्टीची जडणघडण श्रीकृष्ण आणि होळीच्या उत्सवाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. मानवी जीवन हे होलिकोत्सवा सारखे  एक उत्सव पर्व आहे, मानवी भाव भावनांचे विविध पैलू हे त्यातील विविध रंग आहेत या संकल्पनेतून ही रचना केली गेली आहे. कवी श्रीकृष्णाशी संवाद साधत म्हणतात, "हे श्रीकृष्णा किती नवलाईची होळी तू  साजरी करतो आहेस. मला वाटणारं आश्चर्य मी शब्दात मांडू शकत नाही."

एक समय श्री कृष्णा प्रभो को, होरी खेलें मन आई
एक से होरी मचे नहीं कबहू, याते करूँ बहुताई
यही प्रभु ने ठहराई, कैसी होरी मचाई…

आता या होळीचे वर्णन करताना कवी म्हणतात, "श्रीकृष्णांच्या मनात होळी खेळण्याची अनिवार इच्छा झाली. पण आपण एकट्याने हा उत्सव साजरा करू शकणार नाही हे ते जाणून होते म्हणूनच त्यांनी ठरवून या अनेक जीवांच्या सृष्टीची निर्मिती केली." होळी हा उत्सव एक एकट्याने साजरे करण्याचे पर्व नसून एकमेकां वर रंग उडवूनच  आनंदाची देवाणघेवाण होऊ शकते. म्हणूनच कवी म्हणतात भगवान श्रीकृष्णाला एकट्याला होळी आवडत नाही. आणि म्हणून त्यांनी चराचर व्यापून टाकणाऱ्या या सृष्टीमधील लीलांची निर्मिती केली. तेव्हापासून आजतागायत ही प्रक्रिया अव्याहत सुरू आहे. त्या जगनियंत्याच्या या खेळातून ज्या रंगांची उधळण केली जाते ते  रंग माणसाला नेहमीच अचंबित करतात, आश्चर्यचकित करतात. बरेचदा हे रंग डोळे दिपवून टाकणारे असतात. समाजप्रियता आणि सामूहिकता ही भारतीय तत्व कवीने या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पांच भूत की धातु मिलाकर, अंत पिचकारी बताई
चौदह भुवन रंग भीतर भर के, नाना रूप धराई
प्रकट भये कृष्ण कन्हाई, कैसी होरी मचाई..

कवी म्हणतात,"या सृष्टीतील पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतां मधील विविध घटकांच्या मिश्रणाने या होलिकोत्सवा साठी पिचकारी तयार करण्यात आली आहे. या पिचकारीत चौदा भुवनांमधील अनेकविध रंग विविध रुपात दृश्यमान होतात. आणि या पार्श्वभूमीवर श्रीकृष्ण अवतरतात."

पांच विषय की गुलाल बना के, बीच ब्रह्माण्ड उड़ाई
जिन जिन नैन गुलाल पड़ी वह, सुध बुध सब बिसराई
नहीं सूझत अपनहि, कैसी होरी मचाई...

"डोळे, कान, नाक, जिभ आणि त्वचा या पंचेंद्रियांच्या माध्यमातून होणाऱ्या दृष्टी, श्रवण, गंध, रस आणि स्पर्श  या संवेदनांचा गुलाल श्रीकृष्ण बनवितात आणि या सृष्टी मध्ये त्याची उधळण करतात. आणि ज्या ज्या जीवावर हा रंग पडतो म्हणजेच हया संवेदना तयार होतात तो प्रत्येक जीव शाश्वत वास्तवाचे भान विसरतो आणि आपल्याच  जाणिवेत या संवेदनाच्या रंगात आकंठ बुडून जातो."

वेद अनेक अनजन की सिला का, जिसने नैन में पायी
ब्रह्मानंद तिस्का तम नास्यो, सूझ पड़ी अपनहि
ओरि कछु बनी न बनाई, कैसी होरी मचाई...

वेदां मध्ये सांगितल्या गेलेलं अध्यात्म ज्ञान हे जणू दृष्टी निकोप राहण्यासाठी डोळ्यात घातल्या जाणारं नेत्रांजन आहे. ब्रम्हानंद म्हणतात, "ज्याच्या डोळ्यांमध्ये हे अंजन घातल्या गेलं, म्हणजेच ज्याला ही ज्ञानप्राप्ती झाली त्याच्या समोरचा अंधःकार नाहीसा होतो." म्हणजेच त्याच्या मनःचक्षू समोर असलेला अंधकार दूर होतो आणि त्या दिव्यदृष्टी मुळे त्याला या मायावी जगातील फोलपणाची जाणीव होते आणि आत्मसाक्षात्कार होतो.

ही सृष्टी हाच मुळी एक खुला रंगमंच आहे ज्यावर जीवनाचा खेळ नित्यनूतन रुपात सादर होत असतो. प्रत्येकाच्या वाट्याला या खेळात एक विशिष्ट भूमिका येत असते आणि ती भूमिका त्याला आपल्या क्षमतेनुसार वठवावीच लागते. प्रत्येक नाट्यप्रयोगानंतर जसे नट चेहऱ्यावरचे रंग उतरवून त्या भूमिकेतून बाहेर पडतो त्याचप्रमाणे जीवनात वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका पार पाडतांना योग्य वेळी वाट्यास आलेल्या भूमिकेतून बाहेर निघता आले पाहिजे. होळीचे रंग खेळल्या नंतर जसे चेहरा धुवून रंग उतरवला जातो आणि चेहरा अधिक उजळून निघतो त्याचप्रमाणे या जीवनातील विविध रंगांचा आनंद घेत असताना त्यांच्या मोहात न पडता योग्य वेळ आल्यावर हे रंग उतरवून जीवन उजळता आले पाहिजे. या खेळाचा निर्मळतेने आनंद घेता आला पाहिजे. सुरेश भटांनी म्हटल्या प्रमाणे "रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा" असे वागता आले पाहिजे

या खेळातून सुटका म्हणजे मोक्ष .. पण माणूस या जीवनातील विषयां मध्ये, त्यामुळे घडणाऱ्या व्यापतापां मध्ये इतका गुंततो की मोक्ष प्राप्ती करीता त्याला हजारो जन्म घ्यावे लागतात. या मोक्षप्राप्ती करीता मानवजन्म प्राप्त झाल्यावर करायला हवी अध्यात्मसाधना. ज्यामुळे नियमितपणे मनःचक्षू चे शुद्धीकरण होत राहील. आणि मद, मत्सर, काम, क्रोध, मोह, विषय वासना इत्यादी विकार रुपी रंग चिकटून बसणार नाहीत. 

हेच तर हा होलिकोत्सव आपल्याला शिकवत असतो ना !!

28 मार्च 2021
____________________________________
प्रसाद पोफळी, नागपूर | 9822569648

No comments:

Post a Comment